Wednesday, September 22, 2021

सुमधुर आठवण - शहनशाह बाबा अवतार सिंह जी

बाबा अवतार सिंह जी - ज्यांना सर्वजण प्रेमाने आणि आदराने शहनशहाजी म्हणून संबोधत - 17 सप्टेंबर 1969 च्या दिवशी, आपल्या नश्वर देहाचा त्याग करून निराकार स्वरूपात विलीन झाले.

जेव्हा मला ही बातमी मिळाली तेव्हा मी हरियाणातील कैथल येथे होतो - जिथे नुकतीच एक शिक्षक म्हणून माझी पहिली नोकरी सुरू केली होती.
बातमी मिळताच कैथलचे प्रमुख महात्मा श्री दलीपसिंह जी आणि त्यांच्या कुटुंबासह आम्ही काहीजण दिल्लीला जायला निघालो आणि रात्री संत निरंकारी कॉलनीला पोहोचलो.
                           ~ ~ ~ ~
      ~ ~ ~ ~      ~ ~ ~ ~
मला लहानपणापासूनच हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप रस होता आणि सत्याचा शोध घेण्याची तीव्र जिज्ञासा देखील होती. जेव्हा मी तेरा वर्षांचा होतो, तेव्हा मला हायस्कूलमधील एका मित्राद्वारे बाबा अवतार सिंहजी यांच्या संपर्कात येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.

त्यांनी स्वतः मला ब्रह्मज्ञान दिले आणि माझ्या मनावर त्यांचा कायमचा ठसा उमटला. माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि श्रद्धेची भावना राहिली आणि आजही आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद वैयक्तिकरित्या अनेक वेळा मिळाले आहेत.
                           ~ ~ ~ ~      ~ ~ ~ ~      ~ ~ ~ ~

त्या दिवशी निरंकारी भवनात जेव्हा मी त्यांचे निश्चल शरीर पाहिले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले.
ग्यानी जोगिंदर सिंहजी माझ्या शेजारीच उभे होते.
माझे अश्रूयुक्त डोळे पाहून ते म्हणाले -
"राजन जी! तुम्ही एक ब्रह्मज्ञानी आहात - तुम्हाला तर माहीतच आहे की हे फक्त शरीर आहे आणि शरीर कोणाचेही असले तरी ते नाशिवंतच असते.

शहनशाह जी आपल्यासोबतच आहेत. त्यांचे विचार लक्षात आहेत ना? ते अनेकदा म्हणायचे की "शरीर म्हणजे गुरु नाही, गुरु म्हणजे ज्ञान आहे जे शरीरापलिकडे आहे. शरीरे येत जात राहतात - रूप बदलत राहतात, म्हणून फक्त सर्वशक्तिमान निराकाराचे ध्यान करा. आपले लक्ष फक्त ज्ञानावर केंद्रित करा - माझ्या नश्वर शरीरावर नाही"!
ग्यानीजी पुढे म्हणाले की "शहनशाहजींनी आपल्याला जे शिकवले आणि समजावले ते आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. आपण निरंकारी आहोत - निराकाराचे उपासक आहोत - म्हणून आपण गुरूंच्या शरीराबरोबर आसक्ती न ठेवता त्यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन केले पाहिजे."

ग्यानीजींच्या शब्दांनी माझ्या मनाला धीर आला आणि शहनशाहजींनी निरंकाराप्रती शिकवलेला दृष्टीकोन अजूनच दृढ झाला.

परंतु तरीदेखील - आजही शहनशाहजींचा दिव्य आणि तेजस्वी चेहरा नेहमी डोळ्यांसमोर येतो, त्यांचे प्रेम आणि त्यांची शिकवण मी कधीही विसरु शकत नाही.
ते नेहमीच माझ्या हृदयात आहेत आणि नेहमी राहतील.
                                                ' राजन सचदेव '



2 comments:

The Answers we Seek जिन प्रश्नों के उत्तर ढूंढ रहे हैं

The answers we seek...          ... Are hidden in the silence that we try to avoid.  And the miracle we want             is inherent in the ...